सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला. हा वेढा फोडणे अशक्य होते. नेताजी पालकर आणि सिद्दी हिलाल मराठी फौजेला घेऊन पन्हाळ्याचा वेढा तोडण्यासाठी निघाले. त्यांना जौहरच्या राखीव सेनेने वाटेतच गाठले. महाराजांना हे कळताच त्यांनी जौहरला शरण येण्याचा खलिता धाडला. जौहर गाफील झाला हे पाहून महाराज गडावरून चोरवाटेने निसटले पण घात झाला. त्यांची पालखी सिद्दी जौहरच्या हेरांनी ओळखली. जौहरचे सैन्य महाराजांचा पाठलाग करू लागले. महाराज अतिशय वेगाने विशाळगडाकडे निघाले. शर्थ करून सर्वांनी गजापूरची खिंड गाठली. गड चार कोस दूर होता. बाजींनी हट्टाने महाराजांना विशाळगडाकडे जायला लावले आणि निम्म्या सेनेनिशी घोडेखिंडीच्या तोंडाशी बाजी उभा राहिला. महाराज गडावर पोहचून इशारती होईपर्यंत बाजी खिंड झूंजवणार होता. सिद्दी मसूदचा हल्ला आलाच. खिंडीवर भयंकर रणकंदन सुरू झाले....!